Wednesday, 28 February 2018

तिन्ही सांज


मोरपिसे मनातील हि पोस्ट वाचत असताना

मला माझी आई दिसू लागली

अलीकडे असच होत
कोणतीही गोष्ट करताना

मेसेज वाचताना आईच दिसते... 

सुंदर, शांत, हसतमुख...
सौज्वळ...

• कामावे तो सामावे

• मी हात धरून काहीच शिकवणार नाही... बघून शिक म्हणणारी....

• पण माझ्याघरी आली कि पडेल ते काम करणारी
सतत कामात राहणारी आई... 
• काम नसेल तर निवड टिपण करणारी, 
लादी घासून पुसून चकचकीत करणारी

• कधीही रडगाणं न गाणारी... 
• माझ्या मैत्रिणीत सामावणारी...

ओह... किती लिहिलं 
विषयाला सोडून

2
संध्याकाळी आमच्या घरचे वातावरण खूपच छान असे....
शांत, स्वच्छ...
अगं वडील एस टी मध्ये
बदलीच्या गावी असत.

म आम्ही तिघे, आमचे मित्रमंडळ...
रूम एकच.. 
तरी 8,9 जण असायचो
परवाचा म्हणायला

3

 दिवेलागण... 

संध्याकाळ झाली कि आईची सर्व कामे झालेली असत
म देवदिवा लावण्यापूर्वी आई... 

शुभम करोति म्हणा 

मुलांनो शुभम करोति म्हणा... 

हे गाणे म्हणत असे
आणि

 एकीकडे उदबत्ती निरंजन लावत असे

तोपर्यंत आमचे मित्रमंडळ जमा होई.

हे सगळे माझ्या आईला
शांताबाई, किंवा रेखाच्या आई म्हणत

आम्ही कलावती आई यांची बालोपासना म्हणत असू.


आईने त्याला स्वतःची चाल लावली होती.

तिच्या बरोबर म्हणत असू

(कलावती आई यांना मी प्रत्यक्ष बघितले आहे)


अजूनही मी म्हणते...

म पाढे म्हणत होतो
बहुतेक मित्रमंडळ
 त्यांच्याकडे अशी परवाचा
म्हणायची पद्धत नव्हती..

आपण देवापुढे दिवा, किंवा देवदिवा लावला, 
निरांजन लावले, ज्योती उजळवल्या...
असे म्हणतो
त्यांच्याकडे बत्ती लावली असे म्हणत..
पण सगळे जसे खेळायला जमत तसे शुभम करोति म्हणायला जमत होतो...
अजूनही ते आईची आणि दिवे लागणीच्या वेळेची आठवण काढतात....

आणि तरीही माझी आई अजिबात देव देव करणारी नव्हती...

पण आलेले सण 
तिन्हीसांजा.... अगदी आनंदाने करत असे...

कोणालाही कसलीही जबरदस्ती न करता...


असो

पुढे इकडे आल्यावर मी देखील... 
आई सारखेच करत आहे..
तिच्याच चालीत बालोपासना म्हणते.

पण कधी सप्ताहाला गेले नाही
मुलांनी म्हटलेच पाहिजे असा आग्रह धरला नाही.
मला वाटते कि म्हण, कर असे म्हटले तर
 मुले बंडखोरी करतात आणि त्याविरुद्ध वागतात.

मुलांना येत नाही
( बालोपासना)
माहित पण नाही

पण पाढे इतर श्लोक म्हणत असत.

ते मात्र छान शिकले.



 आई हे सगळे म्हणताना... 
आमटी भात, एखादी कोशिंबीर
किंवा तळण तळत असे...
म्हणजे लवकर जेवणे होत.
म अभ्यास करायला वेळ मिळे.

माझा अभ्यास 4 थी पर्यंत आणि छोट्या भावाचा अभ्यास 7वी पर्यंत घेतला...

आम्ही कधी क्लासला गेलो नाही
पण छोट्या भावाला मात्र आठवीत क्लास लावला होता...

 मोरपिसे मनातील याचा हा काही भाग 
( ज्यामुळे मलामाझ्या आठवणीत नेले )
 देवापुढे दिवा लावायला उठले. आणि नेहमी प्रमाणे समई च्या प्रकाशात आई चा चेहरा देवीच्या जागी दिसला. 
रोज संध्याकाळी देवा पुढे दिवा लावून माझी  वाट पहात बसायची . 
नेहमी म्हणायची माझे हे वाट पाहणे कधी संपणार काय माहीत.

Sunday, 25 February 2018

दोन प्रहर प्रार्थनेसाठी

प्रार्थनेच्या दोन वेळा महत्वाच्या

दोन प्रहर प्रार्थनेसाठी  फार महत्वपूर्ण आहेत.


★ पहिला प्रहर सकाळचा, 

जेव्हा रात्र सरलेली असते.
परंतु दिवस मात्र अजून उगवलेला नसतो. 

तर 

★★दुसरा प्रहर संध्याकाळचा

जेव्हा दिवस मावळलेला असतो 

अन रात्र मात्र नुकतीच सुरु झालेली असते. 

हे दोन क्षण प्रार्थनेसाठी

 सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहेत. 

कारण या दोन समयी आपण

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सर्वाधिक मुक्त असतो.

     

या वेळी आपण आपल्या सर्वाधिक निकट असतो. 
आणि परमेश्वर आपल्या निकट असतो. 
आपण थोडासा हात पुढे करायचा अवकाश, 
कि तो आपल्या हाती लागू शकतो.
म्हणून आपण या वेळी प्रार्थना करतो.

हे संकलन आहे...

*******************************

आता मला जे सुचलं, वाचलं, ऐकलं ते लिहित आहे

*******************************
प्रत्येकाची प्रार्थना वेगळी असते... 
स्वतःचे शब्द असतात
त्यामध्ये श्रद्धा असते.!
प्रत्येक क्षणी प्रार्थनेचे शब्द वेगळे असतात
जसे

सकाळी... कराग्रे वसते लक्ष्मी... 

आंघोळीच्या वेळी.. गंगे च यमुने चैव

गणपती स्तोत्र

कुलदेवता स्तोत्र

या कुन्देन्दु तुषार हार धवला

कुणी सतत नामसमरण करतात

संध्याकाळी शुभम करोति

रामरक्षा, मारुती स्तोत्र


रात्री कालभैरव स्मरण.
पड पड कुडी धारणीवरी..

काही देवाकडे मागत असतात.
काही देवाबरोबर भांडतात... 
असे माझेच का?? 
माझ्या नशिबी हे भोग का???

काही नुसतेच नतमस्तक होतात,
आणि म्हणतात...
देवा तुला माहित आहे
 माझ्यासाठी काय योग्य काय अयोग्य...!!!

जे काही माझ्याजवळ आहे ते तू दिलेले आहे.

तू दिलेल्या घरात आम्ही राहतो...

अगदी लहान असताना...
बोबड्या बोलात...

बाप्पा मला चांगली बुद्धी दे... 

असे म्हणतो

मोठे झाल्यावर मात्र...

काही मनासारखे झाले नाही तर....
 देवाला दोष देतो...
 घरातून, मनातून देवाला बाहेर काढतो.

पण.... स्वतः मध्ये डोकावत नाही...


आज घरातील देवासमोर का उभे राहिलो नाही.? 
याचा विचार करत नाही. 

असे कोणते कर्म केले कि...
आज देवळात गेलो नाही?
घरातील देवासमोर उभे राहता आले नाही??? 
याचा विचार करत नाही..

घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करत नाही,


फक्त.. 
परीक्षेच्या वेळी, 
शुभ कार्य असताना 
संकटात असताना देवाची आठवण होते..

मात्र यश मिळाले कि फक्त "मी" असतो

'मी' कष्ट केले 
'मी' मेहनत घेतली 
'मी' पैसे खर्च केले
 'मी' रक्ताचं पाणी केलं,

पण कर्ता करविता परमेश्वर आहे हे त्यावेळी विसरतो....


आनंदाचे दिवस पटकन संपतात... 

असे वाटते..

आपण सर्व या जगन्नियनत्याच्या हाती सोपवून निश्चिंत राहावे,
आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती करावी, 
फळाची अपेक्षा न धरता,

 नेहमी खरे बोलावे,

 कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी,

 दुसऱ्याच्या सुखात सहभागी होता नाही आले तरी एकवेळ चालेल

 पण.. दुःखात मात्र आवर्जून जावे 

व पाठीवर आश्वासक हात ठेवावा...

 मी तुझ्याबरोबर आहे याची खात्री द्यावी.


दुःख पर्वता एवढे 

सुख जवा एवढे ... 

असे वाटते.

* रात्रीनंतर दिवस उजाडतो..
* नाण्याला दोन बाजू असतात....
* नेहमी चांगला विचार करावा..
* खरे बोलले कि आपण काय बोललो हे लक्षात ठेवावे लागत नाही.


असो.. 
********************************

Sunday, 18 February 2018

समुद्रपक्षी.!!


   रविवारची मस्त सकाळ,
   चला जाऊया वॉकला आणि करूया समुद्रपक्षी दर्शन.!

Seabird....!!!

     हे पाहुणे पक्षी बहुतेक नोव्हेंबर/डिसेंबर मध्ये येत असावेत 
(हिवाळ्यात) आता थंडी कमी होऊ लागली आहे,
 आता कधीतरी हे पाहुणे परततील 
 कुठून येतात आणि कुठे जातात ते मात्र माहित नाही.
हजारोंच्या संख्येने येतात,
 पाण्यावर बसून विहार करतात मध्येच किनाऱ्यावर, कट्ट्यावर बसतात
 लोक त्यांना भावनागरी घालतात, ते आनंदाने टिपतात आणि
 एक पक्षी उडाला कि भराभर सगळे उडतात.
 त्यांना जास्त गर्दी, माणसांची आवडत नसावी. 
लोक फोटो काढण्यासाठी, खाऊ घालण्यासाठी इतके जवळ जातात, कि ते पाण्याकडे झेपावतात.! 
पांढरा रंग, चोच पिवळसर, चोची खाली किंचित लाल रंग.

 ( मात्र तो लाल रंग लक्ष वेधून घेतो)

 आणि पंख काळा पांढरा... करडा म्हणू.!!!
 उडू लागले कि इतके छान दिसतात. 
आणि सतत त्यांचा एक वेगळाच ओरडण्याचा आवाज.!
(खूप वेळ ऐकला तर.. कर्कश वाटेल)
 पाण्यावर थव्याने बसतात अलगद विहार होतो, 
जर पाणी संथ असेल त्यांचा विहार संथ.! 
मस्त वाटते. 

उन्हं आली कि बहुतेक पाण्यावर असतात....

मागे एकदा गेटवे येथून लाँच ने फेरी मारली होती 
तेव्हा अगदी आत अगदी कमी म्हणजे मोजता येतील 
इतक्याच संख्येने समुद्रात बघितले होते.!

पण आज मात्र हजारोंच्या संख्येने.!

~~~~~~~~~~~~~~~~~~~

कावळे मात्र मधेच जागा मिळाली तर... 
त्यांची आवडती भावनगरी खाताना दिसतात, 
एरवी कावळे बरेच दिसतात, 
एखादा डोमकावळा दिसला तर त्याला हुसकावून लावतात... 
अती कावकाव करतात..
पण या हजारोच्या संख्येने आलेल्या समोर अगदी गप्प आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चला,..... पाहुण्यांच्या भेटीला,
 नेवूया खाऊ... भावनागरी.!

त्यांना खरतर मासेच आवडतात... 

समुद्रकिनारी उभे राहिले कि ते मासे टिपताना दिसतात.
पण यांची भेट थोडी दुरून घ्यायला हवी  

नाहीतर सेल्फी काढण्याच्या नादात, 

जवळून खाऊ घालण्याच्या नादात 
हे पक्षी पाण्यावर विहरायला जातील आणि 
इतर लोक या आनंदाला मुकतील.

पाहुणे सुंदर आहेत, 

त्यांचे ओरडणे, उडणे,
 पंख फडफडवणे, 
पंख पसरवणे बघताना मज्जा येते.
येताय ना.... लवकर या 
नाहीतर

 एक दिवस न सांगता ते आपल्या देशी निघून जातील.

मग पुढील वर्षाची वाट बघावी लागेल.!

खरतरं दरवर्षीच या ऋतूत हे पक्षी येतात.!
बघते दरवर्षी... पण आज याबद्दल लिहिले..

******************************


समुद्रात विहार करताना बघायचे असेल तर... 

चलो अलिबाग.. लाँचने

खूप दिसतात .....

एक दिवसीय सहल पण होईल.!!





 

Friday, 16 February 2018

यतन्तश्च दृढव्रताः


भगवद्गीता....

 यतन्तश्च दृढव्रताः


९ | १४

सततं(ङ) किर्तयन्तो मां(य्)

यतन्तश्च दृढव्रताः|


नमस्यन्तश्च मां(म्)भक्त्या
नित्ययुक्ता उपासते ||

हे महात्मेजन, सतत माझे कीर्तन करीत, 
दृढनिश्चयाने प्रयत्न करीत आणि
 मला वंदन करीत भक्तीभावाने
 नित्य माझी उपासना करतात.

काल भगवद्गीता संथा देणारे गुरु श्री जोशी सर यांच्या घरी प्रथमच गेलो. 
घरात शिरताच लक्ष गेले ते मोठ्या अक्षरात लिहिलेल्या गीतेतील ...

यतन्तश्च दृढव्रताः

याकडे... 

दृढनिश्चयाने पूर्णपणे प्रयत्न करीन.


आणि खरंच...
 जर कोणतेही काम करायचे असेल,
 साध्य गाठायचे असेल तर 
यतन्तश्च दृढव्रताः

★ हे नक्कीच लक्षात ठेवायला हवे...


आता गीता म्हणण्यासाठी शृंगेरीला जायचे म्हणजे 
खूप खूप प्रयत्न करावे लागणार...
 सतत मुखात श्लोक असावा लागणार, 
काही गोष्टी... 
ज्या सरांनी वेळोवेळी सांगितल्या आहेत
 त्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे 

श्लोक तोंडपाठ, मुखोद्गत असावे लागणार...

कुठलाही श्लोक चटकन म्हणता यायला हवा,


○ समजा ११ व्या
अध्यायातील ३६ वा श्लोक... 
स्थाने ऋषीकेश... हि सुरुवात दिली तर...
हे अर्जुन उवाच
अशी सुरुवात करून श्लोक म्हणायचा आहे.

○○ जे आपल्याबरोबर आहेत त्यांच्या म्हणण्याच्या पद्धती प्रमाणे जुळवून घ्यावे लागते.

त्यांच्याबरोबरीने श्लोक म्हणावे...

○○○ आपले लक्ष समोर जे आपल्याकडून श्लोक म्हणुन घेणार त्यांच्याकडे असले पाहिजे...

ते फक्त हाताने खूण करतात किंवा मानेने खूण करतात...

☆ यासाठीच सरांनी वर्गात सूचना केली होती

 कि डोळे मिटून श्लोक म्हणू नये, 

आपण सगळीकडे बघत श्लोक म्हणावा..


आपल्याला जे प्रशस्तिपत्रक मिळते त्यात 

आपल्या वडिलांचे नाव असते, 

कि यांची मुलगी, मुलगा...
किती छान.!
 आपल्या वडिलांचे नाव प्रशस्तीपत्रकावर.!

सर बोलता बोलता.. 
पटकन एका श्लोकाची सुरुवात करून आपल्याकडे निर्देश करीत.. 
कि आपण तेथून सुरुवात करायची.

☆☆ तिकडे कसे विचारले जाणार याची झलक मिळाली.

आणि तेव्हाच कळले कि 
गीता नुसतीच पाठ असून चालणार नाही तर..
. कुठलाही श्लोक पटकन म्हणता येणे गरजेचे आहे.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆


बघू, सर्वांच्या सहकार्याने तो टप्पा गाठता येईलच...


☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

Saturday, 10 February 2018

मलबार हिल

आम्ही आज संध्याकाळचे वॉक म्हणून

 मलबार हिल

 येथे गेलो..
 इस्कॉन मंदिर येथून गेलो आणि 
समोर बाबूलनाथ मंदिर.! 
छान गेट करत आहेत.. 
मंगळवारी 
महाशिवरात्र आहे ना..!! 
तेथून सरळ चालत, 
नेताजी सुभाष चंद्र बोस
(यांचा सुंदर पूर्णाकृती पुतळा आहे)
 यांचे दर्शन घेऊन पुढे ....
पायऱ्या आहेत त्या बाजूने, निघालो 
पायऱ्या चढताना दमछाक झाली.. 
पण 
कशी नवी केली आहे बाग??? 
हि उत्सुकता होती,
 हा परिसर झाडाझुडुपांनी  नटलेला आहे.
 पायऱ्या जवळ जवळ 100 आहेत, 
पण थोड्या उंच आणि दोन पायऱ्या, 
आणि सरळ रस्ता परत दोन पायऱ्या.!
उजव्या बाजूने मात्र किंचित चढ आणि वळणा वळणाचा छान रस्ता.!
 मी 45 पायऱ्या दमत चढले आणि 

सरळ उजवीकडे चढ चढून वर गेले,

 थोडे कमी दमायला झाले,
पण.... हे उद्यान 25-3-2017 पासून बंदच आहे.! छान करण्यासाठी, काही बदल करण्यासाठी, आधुनिक करण्यासाठी.!
नव्या रुपात कधी समोर येणार??? अनिश्चित काळ.!!!
( अशा तऱ्हेची पाटी लावली आहे)
फक्त झोपाळे आहेत ते वेताचे केलेत एवढे दिसले.!
शेत डोलते तसे डोलणारी झाडे...
 बहुतेक कोंबडा झाडे असावीत..
ती वाऱ्यावर डोलत होती...
बहुतेक फौंटन करतील 
त्याचा गोल दिसला.

खरतर आज वर्तमान पत्रात 

बोन्साय..   वामनवृक्ष.. एक कला

याबद्दल माहिती वाचली आणि वाटले जाऊ आज मलबारहिल येथे.!
(पूर्वी तिकडे असे बोन्साय वृक्ष बघितले होते...)
पण अजून खुले नाही झाले कमला नेहरू उद्यान...

म म्हातारीचा बूट बघायला नाही गेलो
( कुणी म्हणाले छान रंग दिला आहे)
त्याचे रूप बदलले आहे कि आहे तसाच आहे???
बस मध्ये बसून सरळ घरी आलो..
खरतर हा परिसर छान फिरण्यासारखा आहे, 
पुढे जाऊन फिरोज शाह उद्यान चालण्यासरखे .. 
सुंदर सुंदर फुलझाडे 
कलात्मकतेने निगराणी केलेली झाडे, 
बसण्यास बाक.! 
पायी चालायला मस्त लॉन

पण तेथपर्यंत नाही गेलो.!

Tuesday, 6 February 2018

उंबर फुल


आज बरेच दिवसांनी संध्याकाळी वॉकसाठी स्कायवॉक वर गेलो.
साठ पायऱ्या चढून उजवीकडे वळलो,
 आणि गोल फिरून डावीकडे स्टेशन कडे वळलो...
 नजर खाली, काय काय दिसते?? 
याकडे.! 
जाताना उंबर झाड दिसले, 
मनात विचार आला... बघुया फुलं दिसतं का.. 
आता सध्या हिवाळी फुलं दिसली.. 

गुलाबी... pink Tabebuia 

तबेबुयिया

 

कांचन, 

अगदी डार्क रंगाची बोगनवेल,

 

 शंकासुर 

अजूनही


रस्त्याच्या कडेला केशरी रंगाची फुले
 (नाव माहित नाही)
✽ ✽✽ ✽✽  ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽  ✽✽ ✽
आणि काय आश्चर्य????

उंबराचे फुल बघायला मिळाले.!!!

 

दुर्मिळ योग

कच्ची उंबरं दिसली म्हणून वाटले फुल दिसलं तर....
आणि फुल दिसले.!

 उंबराचे फुल दिसत नाही 
अगदी एवढेसे असते आणि इतके कोणी निरखून बघत नसेल...
आता आज आम्ही झाडाच्या उंचीपेक्षा उंचावर होतो....

आणि फुल दिसेल का???

 अशी शोधक नजर होती....

म्हणून वरून खाली 
पण इतके पण खाली नव्हते...
पण ज्या प्रमाणात कच्ची फळे दिसली त्यामानाने फुल मात्र एकच दिसले...

कोणी व्यक्ती बरेच दिवसांनी भेटली
तर अगदी उंबराचे फुल झाला आहेस असे म्हणतात...

या झाडाच्या लाकडापासून उंबरठा करत असत... 

उंबराच्या खोडापासून बनवत असतील म्हणून तो उंबरठा...

 असे तर नसेल?

याच्या मुळाशी दत्तात्रेयांचा वास असतो असे म्हणतात...

 


~~~~~~~~~~~~~~~~~~~
हि फुले जानेवारीत दिसत असावीत

Monday, 5 February 2018

चरण पादुका....


एकदा मारूतीराय आकाशातून जात असता, त्यांचं खाली लक्ष गेलं. 
त्यांना दिसलं की एका देवळात कीर्तन चालू होतं
 आणि रामराया मात्र देवळाबाहेर लोकांच्या चपलांचा ढीग होता, त्यावर बसले होते. 
मारूतीराय लगबगीने खाली उतरले. 
रामरायांना विचारलं , असे का चपलांवर बसलात ? 
तेव्हा रामराया म्हणाले, जाता जाता देवळातून मला ऐकू आलं , 

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे , 

त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे . 


सगळ्यांचं मन बाहेर काढलेल्या चपलांवर होतं ,
 म्हणून मी इथे बसलोय!
....................................................

हा मेसेज आला आणि 

मनात चप्पल याविषयी अनेक विचार येऊ लागले.

....................................................

चप्पल... देवळाच्या बाहेर काढणे...

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
मंदिरात लोक जातात पण... 
    देवळात गेलो तरी लक्ष बाहेर चप्पल चोरी होणार नाही ना.? 
 अनेकांचे लक्ष मंदिरातील देवाकडे नसून बाहेर काढून ठेवलेल्या चपले कडे असते...
(असे मी लहानपणी ऐकले होते.)

पण नवा विचार...

बरं झालं चप्पल चोरीला गेली..
जी काही इडापीडा होती ती गेली.. 
असा एक विचार करतो... 
कदाचित चप्पल चोरी झाली याचा मानसिक त्रास 
करून घ्यायचा नाही म्हणून हा विचार असावा..

पण असा विचार छान ना.!

*******************************

    काही कळलेले विचार


○ कोणत्याही देवस्थानमध्ये गेलो तर... 
चप्पल डावी उजवीकडे ठेवावी,
उजवी डावीकडे ठेवावी.

○ दोन चपला शेजारी शेजारी ठेऊ नये,
थोडी दूर ठेवावी.

○ सगळ्यात चांगले...

लोकांनी देवाचे मनापासून दर्शन घ्यावे 
म्हणून उत्तम सोय देवस्थान करते....

☆ चप्पल रॅक, स्टँड असतात तेथे मोफत चप्पल ठेवता येते.

☆ चप्पल ठेवण्यास पिशवी असते
बिल्ला दिला जातो....
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
☆ नाहीतर... काही लोक हि सेवा... 
पैसे घेऊन चप्पल सांभाळतात...
रोजी रोटी व्यवसाय आहे त्यांचा.
☆☆ कदाचित... चप्पल चोरी करून पैसे मिळवण्यापेक्षा
कष्ट करून पैसे मिळवणे चांगले... हा विचार... 
हि बुद्धी देवानेच या लोकांना दिली असेल.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
☆ काही जण स्वतःची गाडी घेऊन जातात, 
किंवा एखाद्या टूर बरोबर खास गाडी करून जातो तर... 
गाडीतच चपला ठेवतो...

पण असे अनवाणी चालणे काही जणांना जमत नाही
 म अशी मंडळी पायात जुनेमोजे घालून चालतात..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

काही मंदिरात चपला ठेवण्याची सोय नसते.
म पहिल्या व्यक्तीने नीट चपला ठेवल्या तर...
 पुढील व्यक्ती नीट ओळीत चपला ठेवतात..

काहीजणांना चपला भिरकवण्याची सवय असते, 


तर काही अगदी ठरलेल्या जागी व्यवस्थित चपला ठेवतात.. 

जी मंडळी अशी एकत्र जातात
 त्यापैकी एक जण चपलांपाशी उभा राहतो...
बाकीचे दर्शन घेऊन येतात
आणि नंतर राहिलेली व्यक्ती दर्शन घेते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आता बघा हं....
 पूर्वी जेमतेम एक जोड असायचा...
आणि नवीन घेण्यासाठी 

खिशाला, हाताला सवड नसायची...

अगदी चप्पलची खोट, टाच झिजेपर्यंत सुद्धा चपला बूट वापरत असत.
( मुलगी लग्नाची असेल तर गमतीत म्हणत...
 अगदी लग्न जमवण्यासाठी चपलेच्या टाचा झिजवल्या)

आता पूर्वीसारखे नाही..

 एकच चपलेचा जोड..

आता...
मॅचिंग जोड , 
फिरायला जाण्यासाठी, 
घरात घालण्यासाठी, 
लग्नकार्याला जाण्यासाठी, 
वॉकसाठी,
स्लीपर हव्यातच,  
पावसाळी, 
कोल्हापुरी चप्पल तर हवीच, 
मोजेड्या, 

 एक ना दोन एकएक व्यक्तींचे कमीतकमी साताठ जोड तरी असतातच...


काहीजण बाहेर गावी जाताना.... 
 एक सॅक चप्पल बुटचीच असते,

चपलांमध्ये तर किती प्रकार????? 
अनेकरंग, उंच टाचा, पॉइंटेड टाचा, अबबब.!

आता सर्रास वापरले जातात ते 

फ्लोटर्स... 

अगदी छोट्यांपासून ते वयस्कर.. 
सगळ्यांच्या पसंतीस उतरणारे आणि सोयीचे...

काहीजणांना चपलेला अंगठा हवाच असतो

तर काहीजण चपलेचा पट्टा व्यवस्थित न लावता तसेच घसपटत चालतात.

पावसाळ्यात वापरण्यासाठी गमबुट वापरले जात.. 
पण याचा छान उपयोग रस्त्यावर डांबर घालणारे असतात त्यांना छान होतो... 
पायांना गरम डांबरचा त्रास होत नाही...
जंगलातून फिरणाऱ्यांचे
बूट वेगळे असतात.

○ देवांच्या पायात खडावा, पादुका असतात...

तशाच रबरी चपला आहेत..
○ गवतावर चालावे म्हणून.. आता चपलावर आर्टिफिशिल गवत.!
तर 
○ तळव्याला प्रेशर पॉईंट असतात
 ते चालताना आपोआप मिळावे म्हणून

 aqupressure चपला आल्या.!

डॉक्टर्स चपला

 काळ बदलला,

 विचार बदलले हेच खरं आणि चांगले आहे.


अगदी लहान मुलांच्या पादत्राणांची तर इतकी विविधता आहे.....

बघून थक्क व्हायला होते...
(तरी या छोट्यांना मोठ्यांच्या चपला घालायला आवडतात, 
आणि हो उलट चप्पल अगदी हमखास घालतात लहानमुले)

पायात घालण्याच्या या वस्तूची नावाची विविधता पहा

खडावा, 
पादुका, 
खेटर,
 वहाणा,
 चप्पल, 
 चरणपादुका, 
ऑल सीझन..

दुकानांची नावे
पदकमल,
 चरणस्पर्श
मोची...

वास्तूला दृष्ट लागू नये म्हणून 

अगदी छोट्या चपला वास्तूला टांगल्या

जातात.


लेदर चपलाना जास्त पसंती असते.


☆ कपडे धुण्याची लाँड्री असते

 तशी बूट धुण्याची लाँड्री असते...


::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

इतके सगळे असूनही 

काही अनवाणी चालणे पसंत करतात

 तर काही मुद्दाम अनवाणी चालतात.